नवीनशी झालेल्या पहिल्या ओळखीपासूनच, मी त्यांना एक शिस्तशीर, कर्तृत्ववान मित्र म्हणून ओळखायचो. सुरुवातीला जेंव्हा आमचा कॉलेजमधे ग्रुप जमला, तेंव्हा मी नवीनयांच्या हजरजबाबिपणा व हुशारीमुळे त्यांचा हेवा करायचो, त्यांच्यापासून दूर राहायचो, जेणेकरून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे होणारी माझी स्पर्धा टळावी.
परंतु हळूहळू परिस्थिती बदलली. IIT मुंबईच्या प्रदर्शनाला पाहण्यासाठी पहिल्यांदा मी नवीनच्या ग्रुपमध्ये सामील झालो. मुंबई फिरलो. त्यावेळेस विविध प्रकारे मला व सार्या ग्रुपला त्यांच्या विविध गुणांची माहिती झाली. त्यांचा वक्तशीरपणा, त्वरित व योग्य निर्णयक्षमता आमच्या लक्षात आली. माझ्या डोक्यावरून जाणारे IIT प्रदर्शनातील प्रॉजेक्ट्स स्वत: आकलन करून नवीन मला समजावायचे. तिथुनच पुढे ‘रोबोटिक्स’ या विषयावर प्रोजेक्ट करायचा निर्णय त्यांनी घेतला. आयुष्यात ‘रोबोटिक्स इंजिनियर’ होण्याचे त्यांचे ध्येय होते.
या आधीचा नवीनयांचा प्रवास विविधतापूर्ण होता. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९८४ रोजी औरंगाबाद येथे विपीनचंद्र व छाया मंत्री या दांपत्यास झाला. नमिता व अमिता दीदीनी त्यांचे प्रेमाने संगोपन केले. सावंतवाडी, नासिक, अमरावती, पुणे ई. विविध शहरांमधे त्यांचे शिक्षण झाले.
नासिक येथील के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी आय.टी. या शाखेत पदवी घेतली.
त्यांना फोटोग्राफी, गिर्यारोहण तसेच प्रवास हे विशेष छंद होते. तसेच ते महाविद्यालयातील नृत्य आदि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत. विविध इलेक्ट्रॉनिक्स ग्याझेटस वापरण्याची तसेच डिजिट, पीसी क्वेस्ट आदी कॉम्प्यूटर मासिके वाचण्याची त्यांना आवड होती. रोबोटिक्स इंजिनियर होण्याच्या दृष्टीने त्यानी शालेय जीवनापासूनच प्रयत्न सुरू केले. अभ्यासक्रमातील इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स आदी विषयांबाबत त्यांना विशेष रुची होती.
तृतीय वर्ष अभियांत्रिकी मध्ये आम्हाला काँप्युटर DOS सिस्टिममध्ये पेंट सॉफ्टवेअर बनविण्याचा प्रोजेक्ट होता. वर्गातील सर्व मित्रांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रोजेक्ट तयार केले, परंतु नवीन यांनी माऊस कर्सर तयार करणे, प्रिंटिंग आदी कठीण सुविधाही त्या प्रोजेक्टला पुरवल्या होत्या. त्यांचा तो प्रोजेक्ट नक्कीच वाखाणण्याजोगा होता.
त्याच वर्षी नवीन यांनी त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट TCS-Total Communication System वर काम सुरू केले. अंध व्यक्तींना सुलभतेने काँप्युटर टाइपिंग व वाचन करता यावे या उद्देशाने प्रेरित झालेला हा प्रोजेक्ट होता.
अंध व्यक्तींना लिहीण्या-वाचण्यासाठी 'ब्रेल' या लिपीचा वापर होतो. याच लिपीतील अक्षरांना काँप्युटर कि-बोर्डशी संलग्न करून नवीन यांनी एक विशिष्ट कि-बोर्डची रचना केली. तो कि-बोर्ड त्यांनी स्वत: ब्रेल लिपीचा अभ्यास करून बनविला. तसेच काँप्युटर स्क्रीन वरुन अक्षरे वाचता यावीत यासाठीही या कि-बोर्ड सारखे 'ब्रेल-रीडर' तयार केले. ज्यांनी हा प्रोजेक्ट पाहिला त्यांनी नवीन यांच्या प्रयत्नांना दाद दिली.
हा प्रोजेक्ट नवीन यांनी अनेक यूनिवर्सिटीत सादर केला. परुळ यूनिवर्सिटी, बरोडा; कामिन्स वुमेन्स महाविद्यालय, पुणे; के.के.वाघ महाविद्यालय, नासिक तसेच शेगाव महाविद्यालय येथे या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला.
पुढे या प्रोजेक्टला पेटंट करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले.
नागपूर येथे Y.C.C.E. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन आणि मी वेब-डिझायनिंग स्पर्धेत सहभाग घेतला. आमच्या के.के.वाघ महाविद्यालयाची वेबसाइट अभिनव पध्दतीने सादर करून आम्ही स्पर्धेत उतरलो. आमच्या वेबसाइटला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळेच आम्ही पुढे आमच्या I.T. डिपार्टमेंटची वेबसाइट बनविण्याची जबाबदारी स्वीकारली.
महाविद्यालयातील अनेक कार्यक्रम करण्यासाठी मला नवीनच्या कल्पकतेची व विविध कौशल्यांची विशेष मदत झाली.
अंतिम वर्षाच्या प्रोजेक्ट साठी नवीनने आमचा मित्र सुमित सोबत 'रिमोट सोल्जर्स' हा प्रोजेक्ट बनविला. विविध अल्गोरीदम्स वापरून प्रोग्राम केलेला रोबोट या प्रयोगाद्वारे बनविण्याचा प्रयत्न होता. हा रोबोट आपल्या मार्गात येणारे अडथळे ओळखून मार्गक्रमण करू शकतो, हेच या प्रयोगाद्वारे सिद्ध करायचे होते. पुढे संरक्षण क्षेत्रात या प्रोजेक्टचा उपयोग करण्याची त्यांची इच्छा होती.
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होण्याआधीच नासिकच्या 'सारडा'ग्रूप ने नवीन यांना कॅंपस इंटरव्यू मार्फत नोकरी ऑफर केली. नवीन यांनी पुढे जुलै २००६ ते डिसेंबर२००६ या कालावधीत येथे पर्चेस इंजिनियर या पदावर नोकरी केली. या दरम्यान सारडा ग्रूपचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट (सोलार पॅनेल चा वापर करून सोलार भट्टी बनवणे) यात त्यांनी विशेष संशोधन केले.
नवीन यांची नोकरी व्यवस्थित चालली होती, परंतू कुठेतरी एक घुसमट कायम होती. रोबोटिक्स इंजिनियर बनण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी त्यांनी पदाचा राजीनामा देऊन पुणे येथे CDAC इन्स्टिट्यूटमधे ‘एंबेडेड सिस्टम्स’ मधे शिक्षण घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.
शिक्षण पूर्ण होताच डिसेंबर २००७ मधे बंगळूरयेथील ABB या आंतरराष्ट्रीय कंपनीने ‘रोबोटिक्स इंजिनियर’ या पदावर नवीन यांना नोकरीची ऑफर दिली. नवीन यांनी ती स्वीकारली. थोड्याच दिवसात त्यांची प्रगती पाहून कंपनीने त्यांना नव्या प्रोजेक्ट साठी स्वीडन येथे पाठवले.
आपले ट्रेनिंग पूर्ण करून नवीन यांनी तो प्रोजेक्ट यशस्वीरित्या बंगळूर येथे पूर्ण केला.
एक विद्यार्थी ते यशस्वी रोबोटिक्स इंजिनियर हा प्रवास नवीन यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. परंतू जीवनात घडलेल्या अतिशय दुर्दैवी घडामोडींनंतर नवीन यांच्यावर अपघाताने अतिशय क्रूर झडप घातली. त्या घटना, तो काळ, आम्हासाठी अतिशय दुर्दैवी ठरला. आम्ही एक जिवलग गमावला. परंतू त्यासोबतच अनेक कल्पना, प्रयोग, शोध अपूर्ण राहीले व ते आपण सर्वांनी गमावले.
ईश्वर स्व.नवीनचंद्र मंत्री यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
- स्व.नवीनचंद्र मंत्री मित्र परिवार